राजकीय आणि सामाजिक जीवनात ठसठशीतपणे समोर येणारं नाव म्हणजे डॉ. नीलम गोऱ्हे. महिलांसाठी फिरते मदत केंद्र ते राज्यासाठी महिला धोरण ठरवण्यापर्यंत अनेक महत्त्वाच्या टप्प्यांवर त्यांचं मोठं योगदान आहे. महिला अत्याचाराच्या घटना, मुलींना मुरळी बनवण्याची प्रथा बंद करणे, महिला सरपंचांना अधिक बळ देणं, नाटक, चित्रपट आणि मनोरंजन माध्यमांतून महिलांचे होणारे चित्रण, कौटुंबिक हिंसाचार, 'सत्यशोधक महिला परिषद' असो किंवा 'महिला धोरण' तयार करताना घेतलेल्या बैठका असोत, प्रत्येक ठिकाणी त्यांनी महिलांच्या हक्कासाठी ठामपणे भूमिका घेतली. 'भगिनीभाव' ही संकल्पना समाजात रुजवून त्यांनी महिलांना एकजुटीने काम करण्याची प्रेरणा दिली.
'दाही दिशा' हे पुस्तक सामाजिक, राजकीय, शैक्षणिक आणि सांस्कृतिक अशा अनेक पैलूंना स्पर्श करते. हे पुस्तक केवळ महिलांसाठीच नव्हे, तर समाजातील प्रत्येक घटकासाठी दिशादर्शक आहे, आणि महिलांच्या प्रश्नांवर सर्व बाजूंनी विचार करण्यास प्रवृत्त करणारं आहे.
नीलम ताईंच्या लहानपणीच्या आठवणीही या पुस्तकात आहेत. आजोबा-आजी आणि आई-वडिलांनी दिलेले संस्कार, शिक्षणाचे महत्त्व आणि सर्व जग विरोधात गेले तरी जिंकता येते ही शिकवण यात दिसते. महाविद्यालयीन जीवनात, त्यांनी युवकांच्या चळवळींमध्ये सहभाग घेतला आहे, मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर लढ्यात आणि मंदिर प्रवेशाच्या मुद्द्यावर त्यांनी घेतलेल्या भूमिका त्यांच्या सामाजिक बांधिलकीची साक्ष देतात.
डॉ. गोऱ्हे यांचा सामाजिक जीवनातील प्रवास जाणून घेण्यासाठी वाचायलाच हवे असे हे पुस्तक आहे.